रावलापाणी संघर्ष - हौतात्म्य स्मरण दिवस



     २ मार्च अर्थात रावलापाणी संघर्ष दिवस. हा दिवस रावलापाणी हुतात्मा दिन म्हणूनही ओळखला जातो. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील 'रावलापाणी' येथे २ मार्च १९४३ रोजी ब्रिटिश अधिकाऱ्याच्या आदेशावरून वनवासी बांधवांच्या जमावावर निर्घृणपणे गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये  १५ जणांचा मृत्यू तर २८ जण गंभीर जखमी झाले होते. 

     या संघर्षाचे कारणही तसेच होते. मुख्य प्रवाहापासून कायमच उपेक्षित राहिलेला वनवासी समाज संत गुलाम महाराजांच्या प्रेरणेतून संघटित होऊ लागला होता. वनवासी तरुण व्यसनापासून मुक्त होत होते. आपापसातील भेद विसरून सर्वजण एकत्र येऊ लागले होते. संत गुलाम महाराजांनी आप धर्माच्या माध्यमातून समाज संघटित करायला सुरुवात केली होती. 'आप' म्हणजे आपण सर्वजण. 'आप की जय हो' असा नाराच दिला गेला होता. परंतु अल्प काळातच त्यांचे निधन झाले व ही जबाबदारी पुढे संत रामनाथ महाराजांनी उचलली. रामनाथ महाराजांनी गुलाम महाराजांच्या प्रमाणेच कार्य चालू ठेवले. समाज एकत्रिकारणासाठी त्यांनी आरती सुरू केली. १९३८ मध्ये आरती कार्यक्रमात सव्वा लाख इतका समुदाय जमल्याची नोंद आहे. यावरून समाज संघटन किती विशाल झाले होते हे लक्षात येते.

     वनवासी समाजाचं संघटित रूप ब्रिटिशांच्या डोळ्यात सलू लागले होते. वनवासी समाज कायमच ब्रिटिशांच्या विरोधात कुठे ना कुठे लढा देतच होता. त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांची दडपशाही सुरूच होती. त्यामुळे ब्रिटिशांनी प्रस्थापित समाज विरुद्ध वनवासी समाज असा संघर्ष पेटवण्याचा कुटील प्रयत्न केला... त्यामुळे काही ठिकाणी दंगली घडून आल्या. परंतु तरीही संयमित व सामंजस्याची भूमिका दोन्ही वर्गांनी घेतली. 

     ब्रिटिश सत्तेच्या विरोधात देशभर आग धगधगत होती. सर्वत्र ब्रिटिशांच्या विरोधात निदर्शने आणि आंदोलने होत होती. अश्या वातावरणात इतक्या मोठ्या संख्येने वनवासी समाजाचे संघटित होणे ब्रिटिशांना परवडणारे नव्हते, त्यामुळे त्यांनी १९४१ मधेच सामूहिक आरतीवर बंदी आणली. परंतु संत रामनाथ महाराज व त्यांच्या अनुयायांनी या आदेशाला धुडकावून लावले. यानंतर जावळी येथे मोठी दंगल उसळली व जाळपोळ झाली. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात संचारबंदी लावून संत रामनाथ महाराजांसह तीस अनुयायांना जिल्हाबंदी केली. 

    १९४२ मध्ये 'चले जाव' आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनात ब्रिटिशांच्या विरोधात आपणही सहभागी होऊन आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले पाहिजे... तोपर्यंत आपल्यावरील जुलूम व अन्याय थांबणार नाहीत म्हणून जिल्हाबंदी असताना संत रामनाथ महाराजांनी आपल्या अनुयायांना चलेजाव आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. पाहता पाहता हजारोंच्या संख्येने वनवासी भिल्ल समाज महाराजांना येऊन मिळू लागला. मोरवड कडे जात असतानाच ब्रिटिशांनी निझरा नाल्यात रात्रीच्या वेळी या समुदायाला घेरले व बेछूट गोळीबार सुरू केला. कॅप्टन ड्युमनने काहीही दया माया न दाखवता दिसेल त्याला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. या हिंसाचारात १५ वनवासी हुतात्मे झाले तर २८ जण जखमी झाले. हा गोळीबार इतका अमानुष होता की गोळ्यांच्या खुणा आजही तेथील खडकांवर उमटलेल्या दिसतात. 

     निद्रिस्त भारतीय जागा होत आहे, वनवासी समाज संघटित होत आहे, तरुण वाम मार्गापासून दूर होऊन समाजाचा व देशाचा विचार करू लागला आहे... हा बदल ब्रिटिशांना नको होता. म्हणूनच त्यांनी 'फोडा आणि राज्य करा' ही नीती अवलंबली होती. याचा प्रत्यय तत्कालीन वनवासी व बिगर वनवासी समाजाला आला होता... त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांचा डाव यशस्वी होऊ न देता वर्ग संघर्ष वाढू दिला नाही. वनवासी समाजाने देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे त्यांचे अस्तित्व होते तिथे तिथे मातृभूमी, स्वधर्म, संस्कृती व समाज बलशाली व संघटित होण्यासाठी देशविरोधी शक्तींच्या विरोधात आवाज उठवला व त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नाही. अश्या देशभक्त हुतात्म्यांना शत शत नमन. 


©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या